विद्यार्थ्यांचा स्वतःच्या हिमतीवर विश्वास असायलाच पाहिजे - खा. सुप्रियाताई सुळे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 



विद्यार्थ्यांनी वाचन करण्यासाठी मोबाईल हळूहळू बाजूला ठेवावेत.



उस्मानाबाद रिपोर्टर 
- मी प्रचंड लाजाळू होते. मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी मी घरदार सोडून विदेशात गेल्यामुळे तेथील संस्कृती व बोलीभाषा आपलीशी व अवगत करण्यासाठी वाचनाच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वाचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याजवळ असलेले मोबाईल हळूहळू दूर ठेवायलाच हवेत असे आवाहन खा. सुप्रियाताई सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दि.२९ सप्टेंबर रोजी केले. 
उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सक्षणाताई सलगर यांनी युवा संवाद... वेध उज्वल भविष्याचा... देशाच्या भवितव्यासाठी...नवे पर्व...युवा सर्व ... या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य जयसिंगराव देशमुख, जिल्हाधिकारी रमेश घोलप (गढवा, झारखंड), कौस्तुभ दिवेगावकर, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, यशस्वीनी सामाजिक अभियानच्या वैशालीताई मोटे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. डी.बी. गायकवाड, संगीता काळे, श्वेता दुरुगकर, कमल चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अजित दादा पवार विचार मंचचे नंदकुमार गवारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाच्या आयुष्यात यश व अपयश रोज येत राहते. मी देखील लाजाळू तर होतेच. शिवाय शाळेत देखील जास्ती प्रमाणात वाचन करीत नव्हते. मात्र मी वाचन करण्यास सुरुवात केल्यामुळेच माझ्यामध्ये बदल झाला आहे. तसेच मी शरद पवार यांच्याकडून‌ शिकले. कारण पवार हे संसदेत जाण्यापूर्वी १०-१० तास अभ्यास करीत होते. त्यामुळेच देशातील इतर खासदार देखील त्यांना प्रश्न विचारीत नव्हते असे सांगत महिलांच्या आयुष्यात बदल झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील १०० ग्रामपंचायतींनी पतीच्या निधनानंतर पत्नीला कुंकू लावायचा अधिकार महिलांना बहाल केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे सुख देते ते तुम्ही बिनधास्त करीत रहा. त्याबरोबरच व्यायाम, योग, सूर्य नमस्कार, धावणे, चालणे व गाणी ऐकावीत असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला.  यावेळी स्नेहल कांबळे, सुरज पाटील, गफार शेख, पियुषा पाटील, प्रीतम काळे आदीसह इतर विद्यार्थ्यांनी खा.सुळे यांच्याशी थेट प्रश्न विचारीत संवाद साधला. तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खा. सुळे यांनी समर्पक उदाहरणासह देत विद्यार्थ्यांचा उत्साह  वाढवित अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करीत प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी कौतुक दिवेगावकर म्हणाले की, बदलत्या काळात यशाच्या व्याख्या बदलत असून यशस्वी होणे महत्त्वाचे नसते तर टिकून राहणे महत्त्वाचे असते. तसेच प्रामाणिकपणे कमवलेला पैसा हे आपले यश असून त्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहावे व लोकांच्या मदतीला येणे हेच यश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रमेश घोलप म्हणाले की, विद्यार्थ्यांचा जास्ती गुण म्हणजेच मार्क्स मिळावेत यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मार्क्सवादी असायलाच पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे गुणवत्ता असलीच पाहिजे. यश मिळवण्यासाठी प्रेरणा असावी लागते त्यासाठी सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सानिध्यात राहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे तुमच्या प्रयत्नाला प्रमाणिक व योग्य दिशा असली पाहिजे. प्रयत्ना नंतर अपयश आले तर खचून न जाता तग धरून रहायला शिका, तुमची स्वप्न मोठी असली पाहिजेत, जितकी परिस्थिती बिकट असेल तितके प्रयत्न प्रमाणिक असतात. त्यामुळे तुम्ही संघर्ष करीत चालत रहा व सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी ठेवा असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ जयसिंगराव देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना दिशा देण्याची आवश्यकता असून आपल्याच मातीतील अधिकाऱ्यांचे बोल तुम्हाला ऐकता यावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची त्यांनी सांगितले. तर प्रस्ताविका सक्षणा सलगर यांनी मागास जिल्ह्याचा मागासलेला डाग पुसून टाकायची जबाबदारी युवकांची असून त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर मुलींना सहजासहजी खुर्ची मिळत नसल्यामुळे त्यांनी ती खेचून आणली पाहिजे. त्यासाठी जिजाऊ, सावित्री व अहिल्यादेवी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी केसकर व दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थित यांचे आभार संगीता काळे यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे, वैशालीताई मोटे,जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर, ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, संजय निंबाळकर, नंदकुमार गवारे, नितीन बागल, प्रताप सिंहपाटील, युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणताई सलगर, श्वेता दुरुगकर,  मनीषा राखुंडे-पाटील, संगीता काळे, मनीषा केंद्रे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण, कादर खान, बिलाल तांबोळी, संदीप तांबारे, अविनाश तांबारे, मजहर शेरीकर, बाळासाहेब स्वामी, विशाल शिंगाडे, राहुल बनसोडे, त्याचबरोबर अनेक हायस्कूल कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या