उस्मानाबाद रिपोर्टर
पालकमंत्री,खासदारासह तिन आमदार शिवसेनेचे असल्यामुळे ठाकरे सरकार यावर्षी तरी जिल्हयाला न्याय देईल ही जिल्हावासियांची अपेक्षा पुन्हा एकदा फोलच ठरली. जिल्हयातील शिवसेनेचे आमदार,खासदार हे सर्वजन त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ आहेत. ही आपल्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे.असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केले.
आज राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केला.ठाकरे सरकारच आजचे अर्थसंकल्पीय भाषण दिशाहीन असल तरी खुप विस्तृत झाले, हे आपण मान्य करूच परंतु यातून उस्मानाबादकरांना विशेष काय मिळाल? हा खरा प्रश्न आहे.
राज्यातील अनेक प्रकल्पांचा भाषणात उल्लेख झाला, मात्र उस्मानाबादकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, मराठवाडा वॉटर ग्रीड, महिला रुग्णालय विस्तारीकरण, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा प्रशाद योजनेमध्ये समावेश व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पांचा साधा उल्लेखही झाला नाही.
राज्यात इतर ठिकाणी १०० खाटांच्या नवीन महिला रुग्णालये मंजूरीच्या घोषणा आज झाल्या, मात्र नितांत आवश्यकता असताना, अनेक वर्षाची मागणी असूनही उस्मानाबाद येथील महिला रुग्णालय विस्तारीकरणाचा सरकारला पूर्णतः विसर पडला. महिलांच्या आरोग्या विषयी महाविकास आघाडी सरकारची एवढी अनास्था अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून याहून अधिक अर्थसंकल्पावर काय बोलणार?
शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडुन दिल्या नंतर ठाकरे सरकार यावर्षी तरी न्याय करेल, ही जिल्हावासियांची अपेक्षा पुन्हा एकदा फोलच ठरली. यावर उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. हे सर्वजन त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ दिसतात व ही आपल्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे.असे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
0 टिप्पण्या