उस्मानाबाद:रिपोर्टर
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे, ज्येष्ठ गांधीवादी आणि काँग्रेस नेते म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले.
माजी आमदार आलुरे गुरुजी यांनी 1980 ते 1985 या काळात तुळजापूर तालुक्याचे विधानसभेवर प्रतिनिधीत केले. शिक्षण आणि सहकार क्षेत्रामध्ये आलुरे गुरुजी यांचे मोठे योगदान राहिले आहे.अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक असून नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माजी विश्वस्त, लातूर येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन, सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, लातूर येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ सदस्य, अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले.
राजकारणातील प्रामाणिक चेहरा, चारित्र्यसंपन्न नेता, सुसंस्कृत राजकारणी, गांधीजींचे तत्व आत्मसात करून राजकारण करणारे राजकीय नेते, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अभ्यास असणारे गुरुजी यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलुरे गुरुजी यांच्या प्रती भावना व्यक्त होत आहेत. राज्याचे माजी परिवहन मंत्री व बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी आलुरे गुरुजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
जीवश्य कंठश्य मार्गदर्शक हरपला:माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
तालुक्यात कुटुंबापासून ते राज्य पातळीवर काम करताना अनमोल मार्गदश॔क हरपला आहे. तत्ववादी, ध्येयवादी तसेच सर्वच बाबतीत असणारा आधारस्तंभ हरपला आहे. मागील 70 वर्षात मैत्रीचे बंध कधीच तुटले नाहीत आणि घराण्याचे नाते अभेद्य राहिले आहे. आज आलुरे गुरूजींविषयीची भावना व्यक्त करताना शब्द अपुरे आहेत. शिक्षण,सहकार, सामाजिक कार्य याविषयी त्यांचे मार्गदश॔न अमूल्य आहे. गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्वच बाबतीत त्यांचे सहकार्य असायचे. शिक्षण हा पाया आहे. तो प्रत्येक घटकापर्यत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण संस्थांचे जाळे उभा करण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. आज तुळजापूर तालुका, उस्मानाबाद जिल्हा एका शिक्षक मरहर्षीस पोरका झालेला आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि विचार अमूल्य होते:मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री, तुळजापूर .
शोकसंदेश
0 टिप्पण्या