रिपोर्टर: कोरोनाच्या वाढत्या फेलावला रोखण्यासाठी आणि या व्हायरसची साथ पसरू नये म्हणून प्रशासनाकडून औरंगाबादमधील पैठणमध्ये होणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आले होते. त्यांनतर आता राज्यातील सर्वात मोठी समजली जाणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश दिले आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील महत्वाची समजली जाणारी येरमाळा (ता. कळंब) येथील देवी येडेश्वरीच्या चैत्र पौणिर्मा यात्रेस 8 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. दरवर्षी येडेश्वरीची यात्रा पाच दिवस असते. यात्रेनिमित्त चैत्र पौणिर्मेदिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होवून रात्री छबीना मिरवणूक पार पडत असते. मात्र कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून यावेळी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासंबंधी गावकरी आणि प्रशासनाची आज बैठक पार पडली आहे.
या यात्रेला जवळपास 10 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने व कोरोना व्हायरसची साथ पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. बुधवारी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मंदिर ट्रस्ट आणि गावकऱ्यांची या संबधी बैठक घेतली असून, एक मतानी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिर येथून निघणारा पालखी सोहळा व चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या