जिल्हाधिकारी करतात फवारणी, गावकऱ्यांची जिंकली मने.


____________
महाराष्ट्र लाईव्ह

जिल्हाधिकारी म्हणजे सुट-बूट आणि सोबतीला अधिकाऱ्यांचा फौजफाटा. तर खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. पण, याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. मात्र,यवतमाळ जिल्ह्यात हे घडले. येथे  जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले. पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना दणका दिल्याने चर्चेत आलेले यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे मन जिंकले. फवारणी करताना काळजी कशी घ्यावी, हेशेतकरी-मजुरांच्या मनावर ठसविण्यासाठी ते स्वत:च भिसनी गावातील शेतात पोहोचले. फवारणी करताना कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही समजावून सांगितले. फवारणीची किट कशी वापरावी, मास्क कसा वापरावा ही माहितीही त्यांनी दिली. वातानुकूलित कार्यालयात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन आपल्याला माहिती देतो, हे पाहून भिसनीतील शेतकरीहीभारावून गेले होते.