आचार्य अत्रे आणि पु.लं.च्या विनोदाने रसिकांना हसवले



उस्मानाबाद : माणसाच्या मनातील हास्य दुर्मीळ होत आहे. अशावेळी सध्याच्या काळात आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन निखळ आनंद देत आहे. जीवनात असे निखळ हास्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि वक्ते प्रा. मिलींद जोशी यांनी केले. प्रा. जोशी यांनी सांगितलेल्या आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी किस्स्यांनी सभागृहातील प्रत्येकाला मनमुरादपणे हसवले.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रा. मिलींद जोशी यांचे आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे - विनोदाची दोन शिखरे या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व, जीवनात आलेला रटाळपणा आणि तोचतोचपणा टाळण्यासाठी विनोदाचे महत्त्व, विनोदाअभावी मानवी जीवनात निर्माण झालेले प्रश्न अतिशय मार्मिक आणि नेमक्या ओघवत्या शैलीत श्रोत्यांसमोर मांडले. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदाची शैली परस्परविरोधी असली तरी मार्मिक होती. आचार्य अत्रेंच्या विनोदात रांगडेपणा होता तर पु. लं.च्या विनोदात शाब्दिक कोटी जास्त होती, असे त्यांनी सांगितले.

प्रा. जोशी यांच्या नर्मविनोदी शैलीने सर्वांनाच खळखळून हसविले. प्रत्येक माणसाला हसविण्यासाठी विनोद व साहित्यांचे लेखन करण्याचे काम आचार्य प्र.के.अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांनी केले. शाळेतील मुलांना शिक्षणाचा प्रसार व तणावमुक्त वातावरण राहण्यासाठी विनोदी लिखाण काळाची गरज आहे. आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांचे किस्से ऐकताना सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची कारंजी फुलली होती. उस्मानाबादकर रसिक या विनोदी किस्स्यांमध्ये अक्षरश: लोटपोट झाला होता.

आचार्य अत्रे व पु. ल. यांनी जीवनातील संकटावर मात करुन कसा मार्ग काढायचा याचे कौशल्य विनोदात असल्याचे दाखवून दिले. त्यांचे विनोदी लिखाण समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे होते.

किस्से, हशा आणि टाळ्या असे समीकरण ग्रंथोत्सवातील विविध कार्यक्रमात अनुभवायला मिळाले. प्रत्येक किस्स्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि हास्याचे फवारे याने सारे सभागृह दणाणून गेले. एक वेगळा अनुभव या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रोत्यांना मिळाला.

राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथोत्सवात येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात पुणे येथील प्रख्यात लेखक मिलींद जोशी यांनी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे –विनोदाची दोन शिखरे या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अधक्ष ॲड. कुलदीप (धीरज पाटील), जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे सचिव बालाजी तांबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे यांची उपस्थिती होती.