उस्मानाबाद,दि . 28 : 242- उस्मानाबाद विधानसभा निवडणूक निरीक्षक विजय बहादूर सिंग
यांनी उस्मानाबाद शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा
नाही याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी
उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या परिसरातील 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार
संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. त्यांनी तेथे निवडणूकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व कक्षाची पाहणी करुन माहिती घेतली तसेच
निवडणूक कामाबाबत आढावा घेतला
भेटीच्या वेळी
निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू बोधवड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
सुभाष काकडे, वैशाली पाटील तसेच नायब तहसिलदार सर्वश्री राजेश जाधव, सचिन वाघमारे,
एस. एस. रामदासी, न. प. मूख्याधिकारी
शशीमोहन नंदा, पोलीस निरीक्षक श्री.
रायकर, गटविकास अधिकारी व विविध कक्ष प्रमुख
उपस्थित होते.
त्यानंतर निवडणूक निरीक्षक श्री. सिंग यांनी
मिडीया कक्षास भेट दिली. मिडीया कक्षाव्दारे करण्यात येत असलेल्या कामकाजाची
त्यांनी पाहणी केली
*****
वृत्त क्र.:-1102 श्री तुळजाभवानीच्या
दर्शनासाठी भक्तांची रीघ
उस्मानाबाद,दि. 28:महाराष्ट्राची
कुलस्वामिनी मातेच्या दर्शनासाठी श्री
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी चौथ्या दिवशी भक्तांची रीघ लागली होती. ललित पंचमी आणि रविवार असल्याने व याचदिवशी श्रीदेवीजींची नित्योपचार पूजासह रथ अलंकार
महापूजा व रात्री छबिना कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच भक्तांची मोठया प्रमाणात गर्दी होती. श्री तुळजाभवानीचे दर्शन व्हावे, यासाठी भाविकांची पावले
तुळजापूरकडे जातानाचे चित्र दिसत होते.
श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकांसाठी
किमान 22 तास सुरु असते. त्यामुळे भाविकांमध्ये
नवा उत्साह पहावयास मिळाला. ऐवढी मोठी गर्दी होऊनही भाविकांच्या चेहऱ्यावर नवा उत्साह दिसून येत
होता. दर्शन घेऊन जाणारे भाविक
आनंदाने आपल्या गावाकडे परतत असल्याचे चित्रही पहावयास मिळाले.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी
सकाळी 6 वाजता श्रीदेवीजींची नित्योपचार पूजासह रथ अलंकार महापूजा करण्यात
आली. त्यानंतर भवानी मातेच्या दर्शना
करीता व अभिषेक पूजेकरिता
भक्तांनी एकच गर्दी केली होती. यावेळी
पोलीस प्रशासनाने योग्यरितीने नियोजन करुन पोलीस जागोजागी तैनात केले होते.
त्यामुळे भाविकांची सोय होत होती. तसेच नवरात्र महोत्सवातील चौथ्या माळेला लातूर,
बार्शी, सोलापूर, उस्मानाबाद येथून पायी येणाऱ्या भाविकांनी गर्दी केलेली दिसून
आली.
मंदीर संस्थान, नगर पालिका तसेच आरोग्य,
पोलीस, परिवहन विभागाकडून देण्यात
येणाऱ्या सुविधांमुळे भक्तांमध्ये उत्साह होता. यावर्षी मंदीर संस्थानच्यावतीने महत्वाच्या रस्त्यांवर गर्दी होऊ नये,
यासाठी अतिक्रमण हटविल्यामुळे गर्दीवर
नियंत्रण ठेवणे सोपे होत होते. कोणत्याही
भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणा कार्यरत होत्या.
मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध विभाग व
यंत्रणाना सूचना देवून भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश दिले
आहेत. या शिवाय मंदिर संस्थान कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात
24 तास व वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीव्दारे
संपूर्ण मंदिर परिसराचे चित्रीकरण करण्यात येत असून त्याव्दारे नियंत्रण व लक्ष
ठेवले जात आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचे
निर्देशही डॉ. नारनवरे यांनी पोलीस प्रशासनास दिले आहेत. त्यादृष्टीने येणाऱ्या
भाविकांच्या सर्व वस्तुंची तसेच सामानाची सुरक्षा यंत्रणेमार्फत तपासणी केली जात
आहेत.
मंदिर
परिसर व शहरात स्वच्छता राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नगर
पालिकेला निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी ठराविक अंतराने शहराची स्वच्छता करीत आहेत. या
कामात समन्वय राहावा, यासाठी जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या वरिष्ठ मुख्याधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली असून त्याव्दारे समन्वय
साधण्यात येत आहे.
*****